आळंदी नगरपरिषदेची ‘माझी वसुंधरा ४.० अभियानात 22 व्या क्रमांकावर झेप…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

 आळंदी : राज्य शासनाद्वारे एप्रिल 2023 ते मार्च 2024 या कालावधीत पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश या पंच तत्वांवर आधारित माझी वसुंधरा ४.० हे शासनाचे महत्वाकांक्षी अभियान राज्यभर अमृत शहरे, नगरपरिषदा, नगरपंचायती, ग्रामपंचायती स्तरावर राबविण्यात आले. यामध्ये राज्यातील 25 ते 50 हजार लोकसंख्येच्या गटातील एकूण 117 नगरपरिषदां मध्ये आळंदी नगरपरिषदेने मागील वर्षीच्या 38 व्या क्रमांका वरून प्रगती करत 22 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

       राज्य शासनाद्वारे पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल, पर्यावरणाची होत असणारी हानी रोखण्यासाठी माझी वसुंधरा अभियान सुरू करण्यात आले. या अभियानात आळंदी नगरपरिषदेमार्फत वसुंधरा लीग, सायकल रॅली, इ बाईक रॅली, शहरातील शाळा व महाविद्यालये यामध्ये पर्यावरणासंबंधी विविध स्पर्धांचे आयोजन, वसुंधरा दूतांच्या निवडी यांसारख्या कार्यक्रमांच्या माध्यमातून शालेय, कॉलेज च्या विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली.

         तसेच शहरातील नागरिकांमध्ये पाणीबचत, विजबचत ,अपारंपारिक ऊर्जा, कचरा विलगीकरण ,फटाकेबंदी व पर्यावरणपूरक उत्सव साजरे करण्यास प्रोत्साहन यासारख्या विषयावर मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली.

        माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन व जतन करण्यासाठी आळंदी नगरपरिषदेने केलेल्या कामाची दखल घेत जाहीर करण्यात आलेल्या निकालात 25 ते 50 हजार लोकसंख्येच्या गटातील एकूण 117 नगरपरिषदां मध्ये आळंदी नगरपरिषदेने राज्यात 22 वा क्रमांक पटकावला असल्याची माहिती मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.

          सदर अभियान यशस्वीरित्या राबविण्यासाठी आळंदी नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली विष्णुकुमार शिवशरण, शशांक कदम, हनुमंत लोखंडे, संजय गिरमे, विशाल बासरे, सचिन गायकवाड, पाटोळे मॅडम, रोहन जगदाळे व सर्वच नगरपरिषद कर्मचारी, नगरपरिषद शाळांचे सर्व शिक्षक वृंद पर्यावरण दूत, शहरातील सुजाण नागरिक यांनी मोलाचे योगदान दिले.

         नगरपरिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, शाळांचे शिक्षक वृंद, पत्रकार बंधू, सेवा भावी संस्था, जागरूक आळंदीकर या सर्वांचे हे सांघिक यश असून येत्या वर्षात जास्तीत जास्त नागरिक विशेषतः तरुण वर्गास अभियानात सहभागी करून राज्यात पहिल्या 5 मधे येण्याचा प्रयत्न केला जाईल असे प्रशासक तथा मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सांगितले आहे.