पंचायतराज की प्रशासनराज?… भरमसाठ अवैध दारूविक्रीला जबाबदार कोण? भाग ५ रोखठोक प्रा. महेश पानसे

        पंचायतराज व्यवस्थेमध्ये गाव स्तरावर तंटामुक्ती समित्यांचे जेवढ्या वाजतगाजत आगमन झाले,तेवढयाच गतीने गाव तंटामुक्ती समित्या शोभेच्या वस्तू होऊन या समित्यांचे महत्व व वचक कमी होऊ लागल्याने पुन्हा सत्तेचे केंद्रीकरण होऊन कायदा व सुव्यवस्था अडगडीत होऊ लागल्याचे चित्र संपुर्ण तालुक्यांत बघावयास मिळत आहे.

        सर्व तालुक्यातील साऱ्या तंटामुक्ती समित्या बाल अवस्थेत राहिल्याने बेकायदेशीर दारू विक्री, गुटखा विक्री, गावागावात झपाटयाने वाढीस लागल्याचे चित्र आहे.

       पंचायतराज पद्धतीमध्ये तंटामुक्ती समित्यांना मोठे अधिकार बहाल करण्यात आले आहेत. या समितीने घेतलेली दखल प्रशासकीय स्तरावर अंमलबजावणी करीता प्राधान्याने आहे.मात्र सर्व तालुक्यात गावोगावी सुरू झालेली बेकायदेशीर दारू विक्री बघता व काही ठिकाणी पोलीस वा इतर संबधित विभाग गाव समितीच्या तक़ारीची “अर्थपूर्ण” दखल घेऊ लागल्याने या समित्यांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होऊन या शोभेच्या वस्तू झाल्याची खमंग चर्चा आहे. 

          दारूमुक्त गाव ठेवण्याकरीता अनेक गावातील तंटामुक्ती समित्या पोलीस विभागाला कळवितात मात्र या चोरटयांना कारवाही आधीच सावध करुन अवैध दारूविक्रीचा पसारा वाढवून या अतिशय महत्वपूर्ण समित्यांना बाल अवस्थेत ठेवण्याचा संतापजनक प्रकार संपूर्ण पंचायतराज व्यवस्थेचे धिंडवडे काढणार का? हा सवाल उपस्थित होत आहे. 

            चंद्रपूर जिल्ह्यात दररोज कुठेना कुठे मद्य प्राशन करून बेदरकारपणे गाडया चालवून क्षती पोहोचविण्याचा प्रकार चर्चेत असतो.चंद्रपूर जिल्हा सिमेवरील गडचिरोली जिल्हा सिमेवरून खूलेआम देशी व विदेशी दारू पोहोचविली जात आहे.ही बाब नविन नाही पण आजच्या घडीला यामूळेच गडचिरोली जिल्हातही वाहन चालविलेण्याचा बेदरकारपणा वाढत असल्याची चिंता दिवसेंदिवस वाढताना दिसते.

         मूल,सावली,गोंडपिपरी, ब्रह्मपुरी,राजुरा तालुक्यातून देशी,विदेशी चिल्लर विक्रेत्यांनी गत अनेक वर्षांपासून चालविलेली ठोक विक्री व याकडे राज्यात उत्पादन शुल्क विभागाचे व पोलीस विभागाचे “अर्थपूर्ण” दुर्लक्ष भविष्यात अनेक मोठया दुर्घटनांना आमंत्रण देत असेल तर नवल नसावे असे जाणकारांचे मत आहे.

           चंद्रपूर जिल्ह्यात आपल्या नाहीत स्वार्थाकरिता ठोक विक्री करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या प्रशासनातील नटवरलाल यांनी गावपातळीवरील तंटामुक्ती समित्यांना शोभेच्या वस्तू बनविलेण्याचे पातक आपल्या पदरी पाडले असल्याचे बोलले जाते.ठोक विक्रीच्या नादात ग्राम संरक्षण दलाचा जन्म होऊच दिला गेला नाही.

       जिल्हात स्थानीक गुन्हे शाखेकडून चोरटया ठोक मालाची जप्ती सुरु आहे.लाखोचा मुददेमाल पकडला जातो.वाहने पकडली जातात पण बेकायदेशीर ठोक विक्री करणाऱ्यांची नावे पुढे येत नाहीत याचे कारण जनतेला कळायला वाव दिसत नसल्याचे चित्र दुदैवी चित्र बघावयास मिळते.

         जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक कडक कार्यवाहीचा दम भरतात पण ठोक विक्रीचा कळस गाठणाऱ्यांना पाठीशी घालणारे नटवरलाल कोण? हा सवाल मात्रं कायम आहे.

       जिल्हाधिकारी यांनी कडक नियमांचे आदेश काढलेत पण यातील नियमांची ऐशीतैशी करण्यातच धन्यता मानणाऱ्यांमागे प्रशासनातील काही नटवरलाल आहेत अशी जिल्हावासियांची धारणा झाल्याचे स्पष्ट चित्र बघावयास मिळते आहे.

             देशी, विदेशी अनुज्ञप्तीधारक मोठया संख्येने बेकायदेशीर ठोक विक्री करतात व जो पावेतो हे सुरू आहे,ही मानसिकता कायम आहे व या चोरांना पाठीशी घालणारे प्रशासनातील नटवरलाल आहेत तो पावेतो जिल्यधिकाऱ्यांच्या आदेशाची अवहेलना सुरू राहणार असून गावपातळीवर अतिशय महत्वाच्या असणाऱ्या तंटामुक्ती समित्या शोभेच्या वस्तू बनून राहणार यावर जिल्यातील जनता ठाम आहे.