खडकवासल्यातून इंदापूरसाठी पाणी सोडण्यात यावे,आमदार दत्तात्रय भरणे यांची पालकमंत्री अजित पवारांकडे मागणी…

 बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी 

            इंदापूर तालुक्यामध्ये सध्या दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली असून शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याची ही तीव्र टंचाई जाणवत आहे तसेच हातात तोंडाशी आलेली विविध पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत.

             याची गंभीर दखल घेत आज आमदार दत्तात्रय भरणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे खडकवासल्यातून इंदापूर साठी पाणी सोडण्याची आग्रही मागणी केली आहे.

            याविषयी बोलताना आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले की गेल्या वर्षीच्या कमी पर्जन्यमानामुळे जवळपास सगळीकडचेच नैसर्गिक स्रोत यंदा लवकर आटल्याने तालुक्यावर दुष्काळाचे सावट पडले असुन अनेक ठिकाणच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद पडल्या आहेत. त्याचबरोबर तालुक्यातील ब-याच भागातील उन्हाळी पिके जळून गेली आहेत.

           तसेच पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या गावोगावी निर्माण झाली आहे.यामध्ये विशेषतः शेटफळ गढे,लामजेवाडी,निरगुडे,म्हसोबाचीवाडी,लाकडी,वायसेवाडी,कळस,पिलेवाडी,गोसावीवाडी,रूई,थोरातवाडी,मराडेवाडी,बोराटवाडी,कौठळी,बळपुडी,खामगळवाडी,बिजवडी,पोंदकुलवाडी,तरंगवाडी या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत असुन सध्या या परिसरात पाण्याचे टँकर चालू आहेत.

             त्यामुळे दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेऊन खडकवासल्यातुन इंदापुरसाठी पाणी सोडण्याची मागणी पालकमंत्री अजित पवार यांना केली असल्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.