
रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
चंद्रपूर :- कौशल्य असलेल्या मनुष्यबळाची अनेक क्षेत्रात आवश्यकता आहे. मात्र, कंपन्या योग्य व्यक्तीपर्यंत अथवा संबंधित व्यक्ती कंपन्यांपर्यंत पोहचू शकत नाही. या दोहोंमधला दुआ बनण्याचे कार्य पदवीधर रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून गोविंदराव वंजारी फाऊंडेशन करत आहे.
राज्यभरातील विविध नामांकित कंपन्या एकाच ठिकाणी आणून रोजगार उपलब्ध करून देण्याची संधी आम्ही उपलब्ध करून दिली आहे. रोजगार मेळावा ही तरुणाईला त्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी मिळालेले दालन आहे. या संधीचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी यांनी केले.
आमदार अभिजित वंजारी यांच्या पुढाकारातून गोविंदराव फाऊंडेशनच्या वतीने येथील स्वागत सेलिब्रेशन येथे आयोजित पदवीधर रोजगार मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. अभिजित वंजारी होते. मंचावर गोविंदराव वंजारी फाऊंडेशनचे सचिव डॉ. हेमंत सोनारे, नंदुजी धानोरकर, प्राचार्य नरेंद्र बोबडे, डॉ.सतीश बावणे, रघुराम गायकवाड उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार अभिजित वंजारी म्हणाले, या राज्यात बेरोजगारीचा बाऊ केला जातो. मात्र, दुसरीकडे प्रचंड रोजगार उपलब्ध आहेत. जग स्पर्धेचे आहे आणि या स्पर्धेत टिकायचेअसेल तर आपले कौशल्य वाढवायला हवे. पदवीसोबतच वेळेची गरज ओळखून लहान लहान कोर्सेस करायला हवे. संवाद कौशल्य वाढवायला हवे. कंपन्या नोकऱ्या घेऊन आपल्याकडे यायला हव्यात, अशी परिस्थिती आपण निर्माण करायला हवी. गोविंदराव वंजारी फाऊंडेशनने आपल्याला संधी उपलब्ध करून दिली आहे.
या संधीचा लाभ कसा घ्यायचा, निवड झाल्यानंतर, ऑफर लेटर मिळाल्यानंतर त्या संधीचे सोने कसे करायचे, हे उमेदवारांनी ठरवायचे आहे. आयुष्यात संधी वेळोवेळी मिळत नाही. मिळालेल्या संधीचा पुरेपूर लाभ घ्या, असे आवाहन त्यांनी केले. येथे येणारा प्रत्येक विद्यार्थी हा कायम आता आमच्यासोबत जुळलेला असेल. ज्यांना नोकरी अथवा संधी या मेळाव्यात मिळाली नाही, त्यांच्यासाठी यापुढेही गोविंदराव फाऊंडेशन प्रयत्न करेल, असेही ते म्हणाले.
तत्पूर्वी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तविक गोविंदराव वंजारी फाऊंडेशनचे सचिव डॉ. हेमंत सोनारे यांनी केले. प्रास्ताविकातून त्यांनी पदवीधर रोजगार मेळावा आयोजनामागील भूमिका विषद केली. कार्यक्रमाचे संचालन प्रा. रामलाल गायेते यांनी केले. आभार प्रा. दीपक भोंगाडे यांनी केले. मेळाव्यात चंद्रपूर जिल्ह्यातील पदवीधर युवक युवती सहभागी झाले होते.
663 जणांना मिळाले ‘ऑफर लेटर’
पदवीधर रोजगार मेळाव्यात निर्मिती, ऑटोमोटिव्ह, आय.टी., बँकिंग, सर्व्हिस, फार्मा, कृषी क्षेत्रातील सुमारे 36 कंपन्या सहभागी झाल्या होत्या. कंपनीच्या प्रतिनिधींनी पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेत योग्य उमेदवारांची निवड केली. सुमारे 663 युवक युवतींना आमदार ॲड. अभिजित वंजारी यांच्या हस्ते ‘ऑफर लेटर’ देण्यात आले.