समायोजनासाठी वसुलीचा आकडा पस्तीस हजारांने वाढला…  — नविन पदाधिकाऱ्यांचे नांवेही आले उजेडात… — ऑडिओ क्लिप हातात आल्याने बरेच घबाड उघड…

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

         वृत्त संपादिका 

           समायोजन प्रक्रियेतील पात्र असलेल्या उमेदवारांची निवड होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत . त्यासाठी आता संघटनेच्या वेगवेगळ्या कॅडरच्या पदाधिकाऱ्यांनी मागील अनेक महिन्यांपासून रक्कम जमा करून घेण्यासाठी संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आदेश दिले होते अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

           पैसे जमा करण्यासाठी आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीने काम करित असलेल्या कर्मचाऱ्यांना मोबाईलच्या माध्यमातून संपर्क साधला आहे. समायोजनासाठी आता वसुलीचा आकडा पस्तीस हजार रुपयांनी वाढल्याने एक लाख दहा हजार रुपये पर्यंत पोहचला असल्याची माहिती प्राप्त झालेल्या ऑडिओ क्लिप वरुन स्पष्ट होते. मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीने काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाने, लोकप्रतिनिधी , आणि मंत्री यांनी नियमितपणे समायोजन करण्यात येणार असल्याचे केवळ आश्वासन दिले होते.

            मात्र महाराष्ट्रात शासनाच्या कोणत्याही मंत्र्यांनी समायोजन करण्याची औकात दाखविली नाही. ही शोकांतिका आहे. महाराष्ट्रातील शासनानेही काही केले नाही. या संधीचा फायदा घेत आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीने काम करीत असलेल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी समायोजन करण्यात येणार असल्याचे आश्वासन देऊन लाखो रुपये वसूल केले आहे.

           त्यात गडचिरोली जिल्ह्यातील संघटनेच्या विविध कॅडरच्या पदाधिकाऱ्यांची नावे प्रसिद्धी माध्यमाकडे एक ॲडिओ क्लिप आली आहे. भारत देशात अनेक वर्षांपासुन सुरू असलेल्या अनेक राज्यात कंत्राटी पद्धतीने काम करित असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे समायोजन केले आहे. परंतु महाराष्ट्रातील राज्य सरकार यात फार अपयशी ठरले आहे.

          त्यामुळे या संदर्भात गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उमेदवारांची फसवणूक केली आहे आणि जमा करण्यात येणारा पैसा नागपूर , पुणे आणि मुंबई येथे कामं करून देण्यात येणार असल्याचे सांगितलेल्या वरिष्ठ अधिकारी असलेल्या दलालांकडे देण्यात आले असल्याचे प्राप्त झालेल्या क्लिप वरुन स्पष्ट होते. त्यामुळे हा सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे.

            महाराष्ट्र राज्यांत राष्ट्रीय आरोग्य अभियानात हजारो आरोग्य कर्मचारी अल्पशा मानधनावर काम करित आहेत . कर्मचाऱ्यांनी आपले न्याय हक्क, आणि अधिकार मिळवून घेण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून ठिकठिकाणी मोर्चे, उपोषणे, आंदोलन केले. परंतु महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देण्यासाठी अपयशी झाले आहे.. आरोग्य विभागात कायमस्वरूपी समायोजन करुन नोकरी मिळवून देण्याचे आमिष दिले असल्याचे सांगुन लाखो रुपये जमा केले.

            आता गडचिरोली जिल्ह्यासह भंडारा, नागपूर, गोंदिया अमरावती जिल्ह्यातील अनेक तक्रारी समोर येत आहेत. त्यात गडचिरोली जिल्ह्यातील निलेश, वैशाली, देवाडकर , राकेश,अमीत, रोहित, भुषण, जितेंद्रको यांसारखी अनेक नवंनविन नावं समोर येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील हजारो कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

         गडचिरोली जिल्ह्यात शेकडोंच्यावर कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लाखों रुपये उकळल्यावर हा पैसा कोणाच्या घशात घातले हा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या या आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी अनेकांनी या फसवणुकी बद्दल संताप आणि निराशा व्यक्त केला आहे.

          इतके वर्ष होऊनही समायोजन का होत नाही. दहा वर्षापूर्वी पासून सेवा देणाऱ्या उमेदवारांना नियुक्ती करण्यात महाराष्ट्र शासन अपयशी का ठरले. हापपॅंट वाले मनुवादी विचाराचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात माहिती नाही का,? समायोजन करण्यासाठी पैसा कोणत्या सचिवांनी मागीतला ? याचा खुलासा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी करावा.

             गडचिरोली जिल्ह्यातील ए .एन. एम संवर्गातील पैसे जमा करण्यासाठी पोटेगांव आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या अस्मिता , वडधा उपकेंद्रातील वर्षा सालेभट्टी ( धानोरा) रजनी, पोरला प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत काम करीत असलेल्या अमिता यांची टिम सक्रिय होती. अशी आरोग्य विभागात चर्चा सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यात जमा करण्यात आलेली रक्कम अमिता हिने नागपूर, पूणे आणि मुंबईत स्वतः नेऊन दिल्याचीही चर्चा सुरू आहे.

         इतकेच नव्हे सरळ सेवा भरतीत पात्र मुलींनाही समायोजन करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते. आणि ७५ हजार रुपये वसूल करण्यात आले होते. सरळ सेवा भरतीत पात्रं असलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश जिल्हा परिषद प्रशासनाने दिल्यानंतर बरीच माहिती समोर आली आहे. समायोजन प्रक्रियेतील प्रचंड भ्रष्ट,फसवा प्रकार उघडकीस आला आहे.            

       १० ते १७ वर्षे सेवा करुनही कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना शासकीय नोकरी आणी सुरक्षिततेपासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे असंतोष पसरला आहे. त्यातच आरोग्य विभागात कायमस्वरूपी पदे मिळवण्यासाठी त्यांच्याकडून प्रति व्यक्ती ७५,००० ते एक लाख रुपये उकळल्याचा आरोप काही आरोग्य कर्मचाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर केला आहे. आता या रक्कमेचा आकडा वाढत आहे. तो आता एक लाख दहा हजार रुपये झाला आहे.

            दहा वर्षांहून अधिक काळ काम केलेले आहे त्यांनाच कायमस्वरूपी केले जाईल असा आदेश सरकारने जारी करण्यापूर्वी ही रक्कम गोळा करण्यात आली होती असे काही कर्मचाऱ्यांनी सावधगिरी बाळगत दबक्या आवाजात सांगितले. वर्षभरापासून रक्कम भरूनही अनेक कर्मचाऱ्यांना अद्यापही नियमित करण्यात आलेले नाही, त्यामुळे ते हताश आणि चिंतेत आहेत. हा पैसा नागपुरात एका हाप पॅंटवाल्या मोठ्या मंत्र्याला देण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. हा पैसा घेणारा मंत्री कोण असु शकतो याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.

            सैनिक समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष चक्रधर मेश्राम यांनी केलेल्या आरोपांनुसार गडचिरोली, भंडारा जिल्ह्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यातुन हजारोंहून अधिक कंत्राटी कामगारांकडून कोट्यवधी रुपये वसूल करण्यात आले आहेत. धक्कादायक म्हणजे, काही आरोग्य कर्मचाऱ्यांनी ही रक्कम देण्यासाठी खाजगी सावकारांकडून उच्च व्याजदराने पैसे घेतले.

         काहींनी आपल्या ईपीएफ फंडातून पैसे काढून दिले आहेत आता, ते कर्जाची परतफेड आणि घर परिवार खर्चाचे व्यवस्थापन कसे करायचे यांच्यात अडकले आहेत, मंत्री आणि सचिवांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने ही रक्कम वसूल करण्यात आल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.

           भ्रष्ट, फसवे सरकार भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचे स्वप्न दाखवत असतानाच हा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. या घोटाळ्यामुळे संतापाची लाट उसळली असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

      या भ्रष्टाचार प्रकरणात सरकारने लक्ष घालून कंत्राटी कर्मचाऱ्यांचा गोपनीय जबाब नोंदवून संबधित संघटनेच्या पदाधिकऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सैनिक समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ॲड शिवाजी डमाळे, विदर्भ प्रमुख चक्रधर मेश्राम यांनी केली आहे.