
दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : महाराष्ट्रातील प्रमुख तिर्थक्षेत्र असलेले आळंदीत मुख्याधिकारी म्हणून सेवा करण्याची संधी मिळाली आहे हे वडिलांच्या पुण्याईने मला तीर्थक्षेत्र आळंदीत वारकरीऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली असून आळंदीत रुजू झाल्यापासून स्वागतासाठी येणारा प्रत्येक जण नियमित पाणीपुरवठा व्हावा यासाठी प्रयत्न करा अशी प्रत्येकाची मागणी असून त्यामुळे पाणी समस्येवर विशेष भर दिला जाईल.
पाणी हा दैनंदिन जीवनाशी निगडित महत्त्वाचा मुद्दा आहे. गेल्या पाच-सहा महिन्यांत ही समस्या निर्माण झाली असून, मी तिच्या मुळाशी जाण्याचा आणि दीर्घकालीन उपाय शोधण्याचा प्रयत्न करेन. असे आश्वासन आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी दिले.
आळंदी नगरपरिषदेचे नवे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी कार्यभार स्वीकारताच सक्रियपणे कामाला सुरुवात केली आहे. हरिपाठ उद्यानाजवळील गुरुवर्य शांतीनाथ महाराज मठाकडे जाणाऱ्या रस्त्यावर १३ नव्या पथदिव्यांचं उद्घाटन खांडेकर यांच्या हस्ते करण्यात आलं.
यावेळी संजय घुंडरे, अनिल वाघमारे, अशोक उमरगेकर, राहुल चिताळकर, प्रकाश कुऱ्हाडे, दिपक पाटील, उमेश कुऱ्हाडे, विजय बिडकर, मनोज कुऱ्हाडे, संकेत वाघमारे, रंगनाथ महाराज, माऊली बनसोडे आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी खांडेकर यांचा श्रीफळ आणि शाल देऊन सत्कार केला.
खांडेकर म्हणाले, “पहिल्यांदा आलो तेव्हा माऊलींच्या संजीवन समाधीवर नतमस्तक झालो आणि त्यांना सेवा करण्याची संधी मागितली. माऊलींनी ती संधी दिली असून, मी ती सोनं करेन. तत्कालीन मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी आळंदी शहरात विकासाचा मजबूत पाया घातला,त्याचप्रमाणे सर्वांना सोबत घेऊन मी काम करेन.” माझ्या कार्यकाळात आळंदीकरांना रोज पाणी मिळेल, यासाठी प्रयत्न करेन,” असं आश्वासन त्यांनी दिलं.