
दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादीका
मुंबई :- महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई यांना ‘भारतरत्न’ देण्याचा ठराव सोमवारी विधानसमेत एकमताने मंजूर करण्यात आला आहे.
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे,यासाठी केंद्र सरकारला शिफारस करण्याचा ठराव राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेत मांडला होता.
या ठरावाला छगन भुजबळ यांनी पाठिंबा दर्शवला.यानंतर विधानसभेत एक मताने हा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे.सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात विविध मुद्द्यांवर तीव्र वाद सुरु आहेत.
सर्वांच्या एकमताने उपरोक्त महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला आहे.हा ठाव ऐतिहासिक असून प्रगत,पुरोगामी, सुधारणावादी महाराष्ट्राच्या लौकिकात भर घालणारा तसेच ‘भारतरत्न पुरस्काराचा गौरव वाढवणारा आहे,अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त केला आहे.
संपूर्ण देशवासीयांच्या लोकभावनेचा आदर करणारा हा ठराव सर्वानुमते मंजूर होण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व विधिमंडळ सदस्यांचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आभार मानले आहेत.
महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा पुण्यात सुरु करुन, स्त्रीशक्तीला शिक्षणाची दारे खुली करुन दिली.आज अशा सर्व क्षेत्रात महिला मोठ्या संख्येने जबाबदारीच्या पदांवर कार्यरत राहून देशाच्या विकासात आपले योगदान देत आहेत.
याचे संपूर्ण श्रेय महात्मा फुले आणि सावित्रीबाईनी त्या काळात दाखवलेल्या दूरदृष्टी,घेतलेल्या कष्टाला आहेत.
समाजातील दुर्बल,वंचित,बहुजन समाजापर्यंत शिक्षणाची गंगा नेण्यासाठी या दाम्पत्याने केलेले कार्य अलौकिक आहे.त्यामुळेच शेतकरी,कष्टकरी घटकांसह समस्त देशवासियांसाठी ते कायम ‘महात्मा’ राहणार आहेत.त्यांना ‘भारतरत्न’ देण्याचा महाराष्ट्र विधानसभेने मंजूर केलेला ठराव हा लोकभावनेचा आदर करणारा आणि ‘भारतरत्न’ पुरस्काराचा गौरव वाढवणारा ठराव आहे,अशा शब्दात उपमुख्यमंत्री पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.