
दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुणे : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखानाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आजच्या बैठकीकडे सर्व सभासदांचे लक्ष लागले होते.
संस्थापक अध्यक्ष विदुरा उर्फ नानासाहेब नवले यांचा निर्णय काय याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच सर्वपक्षीय संयुक्त बैठकीत दादांचे प्रतिनिधी सुरेश(आण्णा) घुले यांना व्यासपीठावर मानाचे पान देऊन नानांनी ‘साखर पेरणी’ तर केली.
परंतु त्याबरोबरच तालुक्यानुसार इच्छुकांची यादी तयार करण्याची जबाबदारी ही संबंधित नवनियुक्त आमदारांकडे देण्यात आल्यामुळे इच्छुकांनी प्रबळ केलेली मोर्चेबांधणी ‘मवाळ’ झाली की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.
आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये व्यासपीठावर श्री नानासाहेब नवले, सुरेश (आण्णा) घुले, खासदार श्री श्रीरंगआप्पा बारणे, आमदार सुनील शेळके, आमदार शंकर मांडेकर, आमदार बाबाजी काळे, माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सभागृहामध्ये मुळशी तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे, प्रकाश भेगडे शिवसेना अध्यक्ष, उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, माऊली दाभाडे, सर्व मावळ मुळशी हवेली खेड शिरूर तालुक्यातील आजी-माजी पदाधिकारी आजी-माजी संचालक सर्व शेतकरी वर्ग उपस्थित होते.
विशेष म्हणजे आज सर्व पक्ष उमेदवारांची बैठक सुरू होण्याअगोदरच विद्यमान सर्व संचालकांनी आपले उमेदवारी माघार घेण्याचे अर्ज अध्यक्ष नानासाहेब नवले यांच्याकडे सुपूर्द केल्याने बैठकीची सुरुवातच वेगळ्या स्तरावर झाली.
संत तुकाराम सहकारी साखर कारखाना आजतागायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षातील लोकांनी माजी खासदार नानासाहेब नवले यांच्या शब्दाला मान दिला.
आज या कारखान्याला ‘पूर्णत्वाची कडी‘लागलेली असताना अनेकांच्या मनीषा या संस्थेवर सभासद म्हणून येण्याची असतानाच कोणतीही विरोधाची भूमिका न घेता संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले यांनी अजितदादांचे प्रतिनिधी सुरेश(आण्णा) घुले यांनाच या बैठकीसाठी निमंत्रित करून विरोधातील आवाज शांत करण्याचा प्रयत्न केला.
आजच्या बैठकीमध्ये प्रमुख राजकीय प्रतिनिधी खासदार श्रीरंग बारणे माजी मंत्री बाळा भेगडे, विद्यमान आमदार सुनील शेळके, शंकर मांडेकर आणि बाबा काळे या सर्व मान्यवरांनी आपली मते मांडली.
त्यानंतर नानासाहेब नवले यांनी आपल्या भाषणाला सुरुवात करतानाच मी फक्त या तालुक्यातील लोकांची अहोरात्र सेवा केली आहे आणि मी तुमच्या पायाखालची वीट आहे अशी आर्त हाक दिल्यानंतर सभागृह स्तब्ध झाले अन त्यातच नाना नवले यांनी नवनियुक्त आमदारांना आपापल्या भागातील इच्छुकांची नावे आपल्या स्तरावर अंतिम करण्याचे आवाहन केल्याने प्रचंड मनीषा बाळगलेल्या इच्छुकांची मोर्चे बांधणी मवाळ झाली आहे.
संत तुकाराम सहकारी साखर कारखानाची निवडणुक जाहीर करण्यात आल्यानंतर संपूर्ण प्रक्रियेमध्ये दोनच व्यक्तींच्या शब्दाला महत्त्व दिले जाणार याची जाणीव सर्वांनाच होती एक शब्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आणि दुसरा शब्द संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले यांचा!
बदलत्या समीकरणाचा अचूक वेध घेत नाना नवले यांनी मागील आठवड्यात वाकड येथे खासदार श्रीरंग बारणे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीस माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, माजी आमदार अशोक मोहोळ, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, माजी मंत्री बाळा भेगडे, आमदार बाबाजी काळे यांच्या बैठकीत कारखान्याच्या निवडणुकीसाठी एकमताने निर्णय घेण्याची साखर पेरणी केली.
परंतु यामध्येही मावळ मधील नुकत्याच पार पडलेले निवडणुकीचे पडसाद साखर कारखान्याच्या निवडणुकीवर होण्याची शक्यता लक्षात घेऊन आजच्या बैठकीचे आयोजन केले अन् इच्छुकांना मानाचे पान दिले.
निवडणूक जाहीर झाल्यानंतर मावळ भागातून ‘दादाकृपे’ने जोरदार मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली परंतु आज (शनिवार, दि. २२) वाकड येथील श्री.संत तुकाराम मंगल कार्यालयात सर्व उमेदवारांची बैठक होत असताना दादांचे प्रतिनिधीच निरीक्षक म्हणून व्यासपीठावर बसवल्याने अनेकांच्या ‘मनीषा’धुळीस मिळाल्या आणि त्याच सभागृहात सुमारे 100 इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.
संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची निर्मिती झाल्यापासून संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले यांच्या माध्यमातून कायमच या सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले जातात.
परिसरातील सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र घेत 70 /30 फॉर्म्युलानुसार उमेदवारांची निवड केली जाते परंतु आजच्या झालेल्या बैठकीत सर्वच मान्यवर प्रतिनिधींनी जुन्या प्रतिनिधींना थांबवून नव्या प्रतिनिधींना संधी देण्याची मागणी जोरकसपणे केली.
त्यातच कारखान्याच्या नावावर सुरू असलेल्या राजकारणालाही आळा घालण्याची मागणी प्रभावीपणे करण्यात आली. मुळशी हवेली खेड मावळ शिरूर या पाच तालुक्यांमध्ये कार्यक्षेत्र असताना सर्वपक्षीय लोकांना एकत्र आणण्याची सत्तावीस वर्षांची परंपरा कायम राखण्याचे आवाहनही यावेळी सर्वच मान्यवरांनी केले.
संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले यांच्या पाठिंब्यावर कारखान्याने संलग्न सर्व प्रकल्प पूर्ण करून आज ‘पूर्णत्वाची कडी’ लावली आहे.
सर्वपक्षीय बैठकीमध्ये मावळ विधानसभाचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी आपले मत व्यक्त करताना आक्रमक बाणा कायम ठेवत काही मागण्या केल्या आणि तालुक्यातील काही निवडक लोकांना संधी देण्याची आग्रही भूमिकाही घेत वेगळेपणाचे संकेत दिले आहेत.
विशेष म्हणजे संसदरत्न खासदार श्रीरंग बारणे यांनी बिनविरोध करण्याची ‘मनीषा’ व्यक्त करताना नव जुनं करण्याची मागणी करत उमेदवार बदलण्याचीही आपली मागणी संस्थापक अध्यक्ष नाना नवले यांच्याकडे केली.