दिनेश कुऱ्हाडे
प्रतिनिधी
आळंदी : वेतनश्रेणी लागू करणे किंवा मानधनात वाढ करणे, नवीन मोबाईल उपलब्ध करून देणे, पेन्शन लागू करणे आदी प्रमुख मागण्यासाठी २० फेब्रुवारीपासून पासून महाराष्ट्रात अंगणवाडी कर्मचारी संघटनांच्या कृती समितीने अंगणवाडी सेविका – मदतनिस यांनी बेमुदत राज्यव्यापी संप पुकारलेला आहे. दरम्यान या काळात राज्यातील अंगणवाड्या बंद करून सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस संपात सहभागी झाल्या आहेत. या संपाचा आज चौथा दिवस आहे. या अंतर्गत चऱ्होली बीट अंतर्गत येणाऱ्या सर्व अंगणवाडी कर्मचारी मदतनीस सेविकांनी केळगाव ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला गेला, यावेळी केळगाव ग्रामपंचायतीचे अधिकारी दत्तात्रय झिरपे यांना मोर्चात सहभागी मदतनीस सेविकांनी निवेदन दिले याप्रसंगी चऱ्होली बीट अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडीतील सर्व मदतनीस सेविका तसेच अंगणवाडीतील बालक आणि पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
या संपाचा फटका लाखो बालकांना बसताना पाहायला मिळत आहे. अंगणवाडी बंद असल्याने सहा वर्षापर्यंतची बालके पोषण आहारापासून वंचित राहत आहेत. सोबतच र्भवती मातांची तपासणी, लसीकरण, कुपोषण निर्मुलन आदी कार्यक्रमांवरही मोठा परिणाम होतांना पाहायला मिळत आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या संपामुळे गरोदर मातेचा आहार, स्थनदा मातेचा आहार, झीरो ते तीन वर्षे वयोगटातील मुलांचा आहार, तीन ते सहा वर्षे वयोगटातील मुलांचा आहार बंद झालेला आहे. सोबतच कुपोषण कमी करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका – मदतनीस यांचेवर असते, याचा देखील फटका बसताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे हा संपावर कधी तोडगा निघणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. वेतनश्रेणी लागू करणे किंवा मानधनात वाढ करणे, नवीन मोबाइल उपलब्ध करून देणे, पेन्शन लागू करणे आदी प्रमुख मागण्या घेऊन राज्यातील दोन लाख अंगणवाडी कर्मचारी सोमवारपासून संपावर गेले आहेत. खेड तालुक्यातील प्रकल्प कार्यालयावर आंदोलने, मेळावे घेण्यात आले होते. त्यानुसार खेड तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत.