नदीचे प्रदुषण करणाऱ्या उद्योगांवर कठोर कारवाई करणार : केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल

दिनेश कुऱ्हाडे

 उपसंपादक

पुणे : बारामती तालुक्यात सर्वाधिक प्रदूषित झालेल्या नीरा नदीच्या प्रदूषणाबाबत कठोर कारवाई केली जाईल. प्रदूषणामुळे पाण्याचा प्रश्न निर्माण आहे. लोकांनी सुधारावे, त्यांनी कारखाने बंद करायची तयारी ठेवावी, अशा शब्दात केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी निरा नदीचे प्रदुषण करणाऱ्या उद्योगांना इशारा दिला.

        सोमवारपासुन (दि. ५) केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल दोन दिवसीय बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यात सायंकाळी पटेल यांनी सोनगांव येथील सोनेश्वराचे दर्शन घेतले. तसेच निरा नदीची पाहणी केली. यावेळी नीरा नदीत बारामती तालुक्यातील दोन्ही सहकारी साखर कारखाने, तसेच फलटण तालुक्यातील कत्तलखाण्याचे दूषित पाणी हे नीरा नदीत सोडल्याचा आरोप नदीकाठच्या ग्रामस्थांनी केला. तसेच संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. या पार्श्वभुमीवर पटेल यांनी बारामती तालुक्यातील निरावागज येथे गावभेट दौऱ्यात बोलताना कडक कारवाई करण्याचा इशारा दिला.

        पटेल म्हणाले, पाण्याचा ‘रिपोर्ट’ सात दिवसात येईल. जमिनीतील पाणी खराब झाले आहे का याची देखील माहिती घ्यावी लागेल. दूषित पाण्यामुळे पंजाबमधून कॅन्सर ट्रेन सुरु झाली. नदीत दूषित पाणी जावू नये यासाठी प्रयत्न करावे लागतील. नदीचे सगळ्यात नुकसान कत्तलखान्यामुळे झाले आहे. त्यामुळे प्रदुषणाबाबत कारवाई कशी केली जाईल, हे सांगू शकत नाही. पण संकेत मात्र देऊ शकतो, असे पटेल म्हणाले.