कंत्राटी पदभरती जाहिरातीविना व्हावी का.?… — शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कंत्राटी पदभरती विरोधात सर्वत्र असंतोष…. — बेरोजगार युवकांची फसवणूक होण्याची शक्यता?..

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

           वृत्त संपादिका 

            गडचिरोली जिल्ह्यात नव्याने सुरू झालेल्या महाविद्यालयात अनेक प्रकारची पदे भरण्यासाठी शासनाने एका खासगी कंपनीला कंत्राट दिले आहे. त्यात कुशल, अकुशल तांत्रिक तांत्रिक पदांचा समावेश आहे.

            त्यामुळे गडचिरोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणाऱ्या उमेदवारांची चाचणी परीक्षा पारदर्शकपणे घेण्यात यावी अशी मागणी सैनिक समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष चक्रधर मेश्राम यांनी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळविले आहे.

          या बाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे असे मतही पाठविलेल्या पत्रात व्यक्त केले आहे. या महाविद्यालयात कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणाऱ्या पदांची जाहिरात संबंधित कंत्राटदार कंपनीने प्रकाशित करुन पदे भरावी अशी मागणी केली आहे. जाहिरात प्रकाशित न करता परस्पर नियुक्ती करण्यात आल्यास गुणवत्ता प्राप्त उमेदवार या पदांपासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

         त्यामुळे जाहिरातीविना कंत्राटी पदभरतीत गडचिरोलीतील स्थानिक युवकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

           गडचिरोली येथे नव्याने सुरु झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कंत्राटी पदभरतीविरोधात स्थानिक बेरोजगार युवकांमध्ये असंतोष आहे. जाहिरात प्रकाशित न करता परस्पर नियुक्ती करण्यात आली. विशेष म्हणजे, महाविद्यालय प्रशासनाला याबद्दल काहीही माहिती नसून स्थानिक बेरोजगार युवकांनी प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला आहे.

          गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी मागीलवर्षी पूर्ण झाली. परंतु सुरुवातीलाच हे महाविद्यालय वादात सापडले आहे. यावर्षीपासून येथे वर्ग सुरु होणार असल्याने ६६ पदांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येत आहे. बिव्हीजी या खाजगी कंपनीला भरतीचे कंत्राट असून संबंधित कंपनीने कुठलीही जाहिरात प्रकाशित न करता यातील ३३ पदांची भरती केली.

            सोबतच उर्वरित पदे देखील याच पद्धतीने भरण्यात येत आहेत. यात लिपिक, कनिष्ठ लिपिक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक आदी पदांचा समावेश आहे. ही बाब उजेडात येताच स्थानिक पात्र बेरोजगार तरुणांनी यावर आक्षेप घेतला आहे. ही पदे भरण्यासाठी स्थानिक पातळीवर काही राजकीय पक्षांचे दलाल कार्यकर्ते कामाला लागले आहेत.      त्यामुळे कित्येक उमेदवारांची फसवणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

            शासकीय महाविद्यालयात कंत्राटी पद्धतीने भरती न करता नियमितपणे पदे भरण्यात यावी अशी मागणीही चक्रधर मेश्राम यांनी केली आहे. शासनाने कंत्राटी पद्धतीने पदे भरण्याचे धोरण बंद करावे असे मतही निवेदनात व्यक्त केले आहे. 

           केवळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात अनेक विभागात बाह्यस्त्रोत यंत्रणेद्वारे पद भरती करण्यात येत आहे. मात्र, याबाबत स्थानिक सुशिक्षित युवक व युवती अनभिज्ञ आहे. अशाप्रकारे भरती करताना पात्र सुशिक्षितांना यासंदर्भात माहिती होणे अपेक्षित आहे.

           परंतु गडचिरोलीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरू असलेल्या कंत्राटी पदभरती संदर्भात स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना कोणतीच माहिती नाही.

           त्यामुळे पात्र असताना देखील डावलण्यात येत असल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे. यातील काहींनी संबंधित अधिकाऱ्यांना भेटून विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे स्थानिक बेरोजगारांमध्ये प्रशासनाविरोधात नाराजी पसरली आहे. कंत्राटी भरती संदर्भात शासनाने या संदर्भात दिलेल्या आदेशामध्ये पद भरतीच्या जाहिराती संदर्भात उल्लेख नाही, हे विशेष. यासंदर्भात प्रभारी अधिव्याख्याता डॉ. टेकाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित कंपनीला याबाबत विचारणार असल्याचे सांगितले.

          पद भरतीच्या जाहिराती संदर्भात वरिष्ठ स्तरावरून कुठलेही निर्देश नाहीत. सूचना आल्यास त्याचे पालन केल्या जाईल असेही ते म्हणाले.

         शासनाने कंत्राटी पदभरती करताना स्थानिक बेरोजगार युवक युवतींचा विचार करायला हवा. अशाप्रकारे भरती करून ते आमच्यावर अन्याय करत आहेत. इतक्या पदाची भरती होत असताना पात्र असलेल्या स्थानिकांना याबाबत माहितीच नसेल तर या पदभरतीचा काही फायदा होणार नाही.

           त्यामुळे सदर कंत्राट तात्काळ रद्द करण्यात यावा आणि शासन स्तरावर पारदर्शकपणे चाचणी परीक्षा घेऊनच पदे भरण्यात यावी अशी मागणी सैनिक समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष चक्रधर मेश्राम यांनी केली आहे.