दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुणे : दंतकथांनाच इतिहास समजण्याची सवय लागली असल्यामुळे खऱ्या इतिहासाला जाणून घेण्याचा, पाहण्याचा दृष्टीकोनच समाजाकडे नाही.
त्यामुळे खरा इतिहास समाजासमोर येत नाही. ’बखर ललितादित्याची’ या कादंबरीच्या माध्यमातून काश्मीरच्या दडलेल्या इतिहासाला समाजासमोर आणण्याचे कार्य घडत आहे. इतिहासाचे भान ठेवून डॉ.लिली जोशी यांनी तथ्यात्मकता राखत कल्पनाशक्तीला ठराविक प्रमाणातच संधी देत, चिकित्सक वृत्तीने इतिहासाकडे पाहिले आहे, असे प्रतिपादन इतिहास संशोधक, लेखक संजय सोनवणी यांनी केले.
काश्मीर नरेश ललितादित्य मुक्तापीड यांच्या जीवनावर आधारित ’बखर ललितादित्याची’ या डॉ.लिली जोशी लिखित ऐतिहासिक कादंबरीचे प्रकाशन रविवारी (दि. 15) ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांच्या हस्ते झाले. त्या वेळी संजय सोनवणी बोलत होते. विश्वकर्मा प्रकाशनचे सीईओ विशाल सोनी, संपादक संदीप तापकीर मंचावर होते.
पुस्तक लेखनामागील भूमिका मांडताना डॉ.लिली जोशी म्हणाल्या, काश्मीर नरेश ललितादित्य हा अज्ञाताच्या पडद्याआड गेलेला महान नायक आहे. या राजाविषयी फारशी कुणाला माहिती नाही. समाकालीन राजांच्या मांदियाळीत ललितादित्य हा स्वयंप्रकाशित राजा होता. तो फक्त रणवीरच नव्हे तर अत्यंत मुत्सद्दी होता. त्याला हिंदवी स्वराज्याची, लोककल्याणाची ओढ होती.
मंगला गोडबोले म्हणाल्या, डॉ.जोशी यांनी कादंबरीची मांडणी करताना खूप तपशीलाने विचारपूर्वक चतुराईने लेखन करत आठवे शतक आणि एकविसावे शतक यातील नाते जोडले आहे. रुळलेली वाट सोडून त्यांनी केलेल्या लेखनातून प्राचीन भारताचा उज्ज्वल इतिहास समाजासमोर येत आहे. दोन शतकांची सांगड घालताना लेखिकेने योगे ते दुवे साधत लेखनाचा तोल यशस्वीरित्या सांभाळला आहे.
भारताचा इतिहास वाचकांसमोर यावा यासाठी ऐतिहासिक पुस्तकांची निर्मिती करत असल्याचे विशाल सोनी यांनी सांगितले. तर पुस्तकाच्या निर्मितीविषयी संदीप तापकीर यांनी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन संगीता पुराणिक यांनी केले.