
प्रदिप रामटेके
मुख्य संपादक
दखल न्यूज भारत
दिनांक १५ मार्च २०२५,पुणे…
देशातील गरीब,उपेक्षित,शोषित आणि वंचित घटकांसाठी बहुजन समाज पक्षाची स्थापना करीत दलित,आदिवासी,ओबीसींच्या हक्कासाठी आवाज उठवणारे आणि त्यांना राजकारणात स्थान मिळवून देणारे लोकनेते मान्यवर कांशीरामजी यांच्या जयंतीनिमित्त बहुजन समाज पक्षाच्या वतीने त्यांना आज पुणे येथील कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले.
सामाजिक परिवर्तन चळवळीला तन-मन-धन अर्पण करीत अधिक बळकट करण्याच्या संकल्पासाठी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा,देशाच्या आयरन लेडी आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री सुश्री बहन मायावती यांनी यावेळी पक्षाचे नेते,पदाधिकारी,कॅडर आणि समर्थकांचे आभार मानले असल्याची माहिती पक्षाचे प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी शनिवारी (दि.१५) दिली.
बहुजन समाजाला गरीबी,बेरोजगारी,शोषण,अत्याचार,मागासलेपण,जातीवाद,सांप्रदायिक हिंसाचार,धार्मिक तनाव मुक्त जीवन जगण्यासाठी त्यांच्या मताच्या शक्तीची जाणीव करून देत स्वत:चा उद्धार करण्यायोग्य बनवण्यासाठी ‘सत्तेच्या चाव्या’ प्राप्त करणे क्रमप्राप्त आहे,हाच मान्यवर कांशीरामजी यांच्या जयंती निमित्त पक्षाचा सर्वोच्च संदेश सुश्री बहन मायावतींनी दिल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.
मान्यवर कांशीराम यांची जीवनयात्रा आणि त्यांचे कार्य समाजातील दीन-हीन,शोषित व वंचित घटकांसाठी एक आदर्श ठरली आहेत.त्यांच्या कर्तृत्वाच्या आधारे त्यांनी देशाच्या राजकारणात आणि समाजकारणात महत्वपूर्ण बदल घडवले.
शोषणाच्या विरोधात आणि समानतेच्या आधारे समाजाच्या प्रगतीसाठी मान्यवर कांशीराम जी यांचे कार्य विशेष वाखाणण्याजोगे आहे.
समाजात परिवर्तन घडवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला त्यांचे हक्क ओळखणे आणि त्यासाठी एकजुट होणे आवश्यक आहे,या मुलमंत्रानूसार कांशीराम यांनी जातिवाद,धर्मवाद,आणि सामाजिक अन्यायाविरोधात लढा दिला.
त्यांचे कार्य आजही बहुजनांसाठी प्रेरणादायी आहेतच शिवाय त्यांचे विचार देखील आजच्या समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे याप्रसंगी डॉ.चलवादी म्हणाले.
बोलण्यापेक्षा करून दाखवण्यावर बहुजन समाज पक्षाचा विश्वास आहे.सुश्री बहन मायावतीजी यांच्या नेतृत्वात देशाने याचा अनुभव घेतला आहे.
त्यांच्या शासन काळात उत्तर प्रदेशचा सर्वांगिण विकास झाला. सर्वसामान्यांसाठी खऱ्या अर्थाने ‘अच्छे दिन’ घेवून येणाऱ्या त्या पहिल्या मुख्यमंत्री ठरल्या,यात दुमत नाही.
परंतु,दुसरे पक्ष प्रत्यक्ष काम करण्याऐवजी केवळ मोठमोठी आश्वासने देण्यात धन्यता मानतात,असे डॉ.चलवादी म्हणाले.