पंकज चहांदे
दखल न्यूज भारत
देसाईगंज- अलिकडे होऊ लागलेल्या शहरीकरणाच्या सिमेंटीकरणामुळे तापमानात प्रचंड वाढ होऊ लागली असुन याचा निसर्गावर परिणाम होत असल्याने वातावरणात अनेक बदल होत असल्याचे दिसून येत आहे. निसर्गाचा समतोल राखण्यात झाडांचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन देसाईगंज न्यायालयाचे न्यायाधीश ए.आर.भडके यांनी केले.
ते देसाईगंज तालुका विधी सेवा समितीच्या वतीने न्यायालयीन परिसरात आयोजीत वृक्षारोपणाच्या कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी जेष्ठ अधिवक्ता ॲड. संजय गुरु, ॲड. बांबोळकर, ॲड. लाँगमार्च खोब्रागडे, ॲड. चोपकार,ॲड. दत्तु पिलारे, सहाय्यक अधिक्षक चव्हाण, अनिल आमटे आदी कार्यालयीन कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
दरम्यान आपल्या मार्गदर्शनपर भाषणात पुढे बोलताना न्यायाधीश भडके म्हणाले की अलिकडे गडचिरोली, चंद्रपुर, गोंदिया व भंडारा या चार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगले आढळून येत असली तरी लोकसंख्या वाढीचा परिणाम जंगलांवर होत असल्याचे दिसून येत आहे. सजीव प्राणीमाञा संपुर्णतः ऑक्सीजनवर अवलंबून असली तरी कोरोना काळात ऑक्सीजन अभावी मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव आहे. निसर्गाने प्राणीमाञांना जीवीत ठेवण्यासाठी नैसर्गिक संरचना करून त्यात ऑक्सीजन उत्सर्जित करण्याचा कारखाना म्हणून वृक्षांची निर्मिती केली असली तरी त्याची महती अद्यापही कळली नसल्याने समस्या असुन ही समस्या सोडवण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे आता काळाची गरज ठरू लागल्याचे त्यांनी सांगितले.
तथापी जेष्ठ अधिवक्ते संजय गुरु मार्गदर्शन करताना म्हणाले की गावरान झाडे ही सर्वाधिक ऑक्सीजन उत्सर्जित करण्याचे स्ञोत असुन मानवी जीवनात उपयोगी वृक्ष लागवड करण्यात आल्यास यापासून दीर्घकाळ फुल,फळे,पाणे वनौषधी म्हणुनही उपयोगात आणली जाऊ शकते. गावरान झाडांचे आयुर्मान फार जास्त असल्याने याचा अनेक पिढ्यांना लाभ होत असतो यास्तव झाडे लावताना गावरान प्रजातीचे झाडे लावण्यावर भर देण्यात यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.
कार्यक्रमाचे औचित्य साधून न्यायालयीन परिसरात मोह, बेहडा, जांभुळ, आवळा आदी गावरान वृक्षांची लागवड करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन ॲड.जुईली मेश्राम यांनी तर आभार ॲड.नेहा ईलमुलवार यांनी केले. कार्यक्रमास पक्षकार आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.