विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळणे आवश्यक आहे :- उपमुख्यमंत्री अजित पवार… — उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आळंदी परिसरात विविध विकास कामांचे भूमिपूजन….

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक

पुणे : आळंदी नगरपरिषदेच्या शाळा क्रमांक ४ च्या नवीन इमारतीच्या बांधकामाला अधिकचा निधी दिला जाईल, असे सांगून अधिकच्या निधीचा प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. 

           शाळा क्रमांक ४ च्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी श्री. पवार बोलत होते. यावेळी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील, माजी जि.प.अध्यक्षा निर्मला पानसरे, अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, तहसीलदार ज्योती देवरे, आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, शिक्षणाधिकारी शिल्पा रोडगे, नगरपरिषदेचे माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, डि.डि.भोसले, शिवसेना शहरप्रमुख राहुल चव्हाण, भाजपचे शहराध्यक्ष किरण येळवंडे, रोहन कुऱ्हाडे, निसारभाई सय्यद, संकेत वाघमारे, सौरभ गव्हाणे, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते. 

           उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, नगरपरिषद शाळा क्रमांक ४ येथील मनुष्यबळाची कमतरता अन्य ठिकाणच्या जास्तीच्या पदातून भरून काढली जाईल. या ठिकाणी विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळणे आवश्यक आहे, असे सांगून नवीन इमारतीचे बांधकाम उच्च दर्जाचे करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

         ते पुढे म्हणाले, संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांचे विचार सर्व जाती धर्माला, वारकरी संप्रदायाला पुढे घेऊन जाणारे आहेत. जिल्ह्यात अनेक महत्त्वाची तीर्थक्षेत्रे आहेत. लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भाविक आणि स्थानिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सणासुदीच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची सर्वांनीच दक्षता घ्यावी. 

          शासनातर्फे गोरगरीब वर्गासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना खूप लोकप्रिय झाली असून राज्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच महिला भगिनींसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला.

         युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली. शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना यासारख्या कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.