
दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादिका
पुणे, १२ फेब्रुवारी २०२५
अवघ्या देशाला भ्रष्टाचारमुक्तीसाठी अहिंसेच्या मार्गाने आंदोलनाची दिशा दाखवणारे समाजसुधारक अण्णा हजारेंचे विचार आजही प्रेरणादायी आहेत. याच विचारांनी प्रेरित होवून भ्रष्टाचार विरोधातील लढ्याचे मुख्य शिलेदार आणि इंडिया अगेन्स्ट करप्शनचे संस्थापक अध्यक्ष हेमंत पाटील हेच अण्णांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचे खरे वारसदार आहेत, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र वनारसे यांनी बुधवारी ((ता.१२) केले.
महाराष्ट्रासह देशातील भ्रष्टाचाराचे समूळ नायनाट करण्यासह नागरिकांच्या वर्तनात बदल घडवून आणण्यासाठी गेल्या अडीच दशकांहून अधिक काळापासून पाटील हे कार्यरत आहेत. मुंबई ते दिल्लीपर्यंत त्यांनी कडवा संघर्ष केला आहे, करीत आहेत आणि करीत राहतील, असे मत वनारसे यांनी व्यक्त केले.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआय मध्ये सुधारणा करण्यासाठी लोढा समितीने केलेल्या शिफारसी लागू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात लढा देवून केंद्र सरकारच्या माध्यमातून बीसीसीआयवर दबाब गट तयार करण्याचे कार्य पाटील यांनी केले.
त्यांच्यामुळेच क्रिकेटविश्वात सुधारणा दिसून येत आहेत. शेतकऱ्यांच्या स्थितीत सुधारणा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यासाठी पाटील यांनीच सर्वोच्च न्यायालयात धाव घेत केंद्र सरकारला याअनुषांगाने पावले उचलण्यास भाग पाडले होते. विशेष म्हणजे आदर्श घोटाळा बाहेर काढून तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना पायउतार होण्यामागे हेमंत पाटील यांचाच भ्रष्टाचार विरोधातील संघर्ष कारभूत होता, असे प्रतिपादन वनारसे यांनी केले.
स्व.मनोहराव जोशी मुख्यमंत्री असतांना भ्रष्टाचारात हात माखलेल्या जवळपास १५० हून अधिक तलाठ्यांना घरचा रस्ता दाखवणारे पुण्याचे तत्कालीन विभागीय आयुक्त अरूण भाटिया यांनी पाटील यांच्या तक्रारीवरच कारवाई करीत भ्रष्टाचार मुक्तीचा संदेश राज्याला दिला होता. पुण्यातील शिक्षण सम्राटांचा भ्रष्टाचार बाहेर काढण्याचे आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचे श्रेयही पाटील यांनाच जाते, असे वनारसे म्हणाले.
समाजहित लक्षात घेता पाटील यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाटील यांच्यावर जबाबदारीचे पद सोपवावे, असे आवाहन वनारसे यांनी यानिमित्त केले आहे.
प्रत्यक्ष राजकारणात न जाता समाज सेवा करण्याच्या किंवा अन्य काही ध्येयधोरणांच्या बाबतीत अण्णा हजारे यांनी दिलेल्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका, असे सुचविणारे पत्र पाटील यांनी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांना दिले होते.
मात्र, अण्णांसह पाटील यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केल्यानेच केजरीवाल यांची आज दुरवस्था झाली असल्याचे, वनारसे यांनी सांगितले. एक चांगला नेता असून देखील काही निर्णय व धोरणे चुकल्यामुळेच केजरीवाल यांच्यावर राजकीय संकट कोसळल्याचे मत वनारसे यांनी व्यक्त केले.