दिनेश कुऱ्हाडे
प्रतिनिधी
आळंदी : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि नगर परिषद आळंदी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रपित्याचे पुण्यस्मरण’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आळंदी येथे घाटावरील रक्षा विसर्जन स्तंभ येथे रविवार,१२ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता हा कार्यक्रम झाला. यावर्षी श्यामसुंदर सोन्नर महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. गांधीवादी कार्यकर्ते, वारकरी बांधव, ग्रामस्थ, विद्यार्थी, युवक – युवती आणि राष्ट्रपित्याचा आदर करणारे नागरिक या कार्यक्रमास उपस्थित होते. खादीची शाल, विनोबा भावे लिखित ‘ज्ञानेश्वरांची भजने’ आणि डॉ.कुमार सप्तर्षी लिखित ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी’ ही पुस्तके देवून शामसुंदर महाराज सोन्नर यांचा सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव अन्वर राजन,राजाभाऊ चोपदार ,काँग्रेस नेते नंदकुमार वडगावकर, बाळकृष्ण आरु, दत्तात्रय महाराज बोरकर, डॉ.प्रवीण सप्तर्षी, संदीप बर्वे, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, देवराम घुंडरे-पाटील,
गणपतराव कुर्हाडे -पाटील, ज्ञानेश्वर घुंडरे, देवराम घुंडरे, राजेश धुंडरे, भानुदास सात्रस, भारत दास, सुदर्शन चखाले, प्रा.नीलम पंडित, दीपक मोहिते, शाम तोडकर तसेच विविध वारकरी संस्थांचे विद्यार्थी महिला टाळकरी उपस्थित होत्या. सुत्रसंचालन अभय देशपांडे यांनी केले.
राष्ट्रपित्याचे पुण्यस्मरण ‘
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर महात्माजींच्या इच्छेनुसार त्यांच्या अस्थी रक्षेचे भारतातील प्रमुख नद्यांप्रमाणे इंद्रायणीमध्येही विसर्जन झाले. एका कलशातील अस्थी रक्षेचे विसर्जन आळंदी येथील इंद्रायणी नदीमधे दि. १२ फेब्रुवारी १९४८ रोजी करण्यात आले. त्यांची स्मृती म्हणून इंद्रायणी काठी रक्षा विसर्जन स्तंभ उभारण्यात आला. दरवर्षी १२ फेब्रुवारी रोजी आळंदी येथे गांधीजींना अभिवादन करण्यात येते. ७५ वर्ष ही परंपरा सुरु आहे.