कणखर छाती करून समानतेचा गाडा नक्की पुढे नेऊ :- प्रणय कोवले… — बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी केला निर्धार…

अमान क़ुरैशी

जिल्हा प्रतिनिधी

      सिंदेवाही :- महापरिनिर्वाण दिनाचे दुःख अपार असले तरीही फक्त रडत आणि हुंदके देऊन चालणार नाही, तर कणखर छाती करून , भीमा मी तुझा वारसदार , तुझा समानतेचा , आणि संघर्षाचा गाडा नक्कीच पुढे नेऊ . अशी जबाबदारी प्रत्येकानं जर घेतली तर निघून गेलेल्या बाबाच्या आत्म्याला नक्कीच शांती मिळणार . असे भावनिक उदगार प्रणय धनपाल कोवले या विद्यार्थ्याने वासेरा येथील आयोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले. 

                  अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडलेल्या समाजाला जागे करून मानवतेची शिकवण देत खऱ्या अर्थाने माणूस बनविण्याऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे ६७ व्या महापरिनिर्वाण दिनी बौद्ध समाज नगर कमिटी वासेरा यांचे वतीने अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. दरम्यान सायंकाळी पाच वाजता गावातील प्रमुख मार्गाने कँडल मार्च काढून बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ग्राम पंचायत सरपंच महेश बोरकर, उप सरपंच मंदा मुनघाटे, सदस्य महेंद्र सूर्यवंशी, नागेश बंडीवार, अस्मिता रामटेके, प्रीती कारमेंगे, सुरेखा चिमलवार, पोलीस पाटील देवेंद्र तलांडे, तालुका पत्रकार संघाचे सचिव महेंद्र कोवले, इत्यादी उपस्थित होते.

          याप्रसंगी प्रणय कोवले या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना पुढे म्हणाले की, आज जरी अंधार झाला असला, तरी त्यात काजवे शोधता आले पाहिजे, त्याकाळात बाबासाहेब यांना शिकण्याची मुबा नव्हती. त्याही काळात त्यांनी आपलीच नव्हे, तर संपूर्ण भारताची गुण पत्रिका पक्की करून ठेवली आहे. त्यामुळे बाबासाहेबांचे ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे. यावेळी पत्रकार महेंद्र कोवले, सरपंच महेश बोरकर, इत्यादींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव आक्रोश खोब्रागडे, संचालन तथागत कोवले यांनी केले. बुद्ध वंदनेने कार्यक्रमाचा समारोप करण्यात .