ओडिशा मधील रेल्वे दुर्घटनेप्रकरणी रेल्वे मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, राजू झोडे यांची मागणी.

प्रेम गावंडे

उपसंपादक 

दखल न्युज भारत

     ओडिशातील बालासोरमध्ये तीन ट्रेनची भीषण टक्कर झाली. या अपघातात मृत्यू झालेल्यांची संख्या २३३ वर पोहोचली आहे. तर जखमींचा आकडा ९००वर गेला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा बहानागा रेल्वे स्टेशनजवळ शालीमार – चेन्नई कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेन, १२८६४ बेंगळुरू – हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस आणि एक मालगाडी अशा तीन एक्सप्रेसची भीषण टक्कर झाली.त्यामुळे रेल्वे मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा व मृतकांच्या नातेवाईकांना भरीव मदत करावी अशी मागणी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी केली आहे.

            काल ओडिशामध्ये मोठी दुर्घटना घडली. मागील काळात डोकावून पाहिले तर रेल्वे अपघातांचे प्रमाण हे सातत्याने वाढले आहे. यात मृत्यूंची आकडेवारी हादरवणारी आहे. एकीकडे आपण बुलेट ट्रेन आणि वंदे भारत सारख्या रेल्वेच्या माध्यमातून आपण आधुनिकीकरण करत आहोत मात्र दुसऱ्या बाजूला अशा प्रकारचे अपघात वास्तव दर्शवणारे आहे.त्यामुळे आता तरी केंद्र सरकारने ठोस उपाययोजना करावी अशी मागणी सुद्धा राजू झोडे यांनी केली आहे.