वणी : परशुराम पोटे
पांदन रस्ते, सार्वजनिक रस्ते तसेच शेतात जाणाऱ्या रस्त्यांच्या समस्या मोठ्या प्रमाणात असुन रस्ते नसल्यामुळे शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. काही रस्ते मोकळे करण्यासाठी महसुल प्रशासनाला पोलिस बंदोबस्त आवश्यक असते, मात्र पोलिस बंदोबस्तासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांची परवानगी लागत असल्याने दोन महिन्यांपासून महसुल विभाग पोलिस बंदोबस्ताच्या प्रतिक्षेत आहे. परिणामी पांदन रस्ते तसेच शेतातील रस्ते मोकळे करण्यासाठीचे प्रकरणे प्रलंबित आहेत.
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील मौजे माणकी येथिल एका शेतकऱ्याने जाणुन बुजुन दुसऱ्या शेतकऱ्याचा रस्ता अडविला आहे. या बाबत त्या शेतकऱ्यांने रस्ता खुला करण्यासाठी महसुल विभाग वणी कडे दोन महिण्याआधी तक्रार दाखल केली. त्या तक्रारीची दखल घेत महसुल विभागाने तलाठी,मंडल अधिकारी यांना मोका पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. अहवालानुसार गैरअर्जदार शेतकऱ्यांने जाणुन बुजुन रस्ता अडविल्याचे म्हटलेलं आहे. त्यानुसार सदर रस्ता खुला करण्यासाठी महसुल विभागाचे तलाठी, मंडल अधिकारी मोका स्थळी पोहोचले असता गैरअर्जदार शेतकऱ्यांने रस्ता खुला करण्यास मनाई केली. शासकीय कामात अडथळा निर्माण केला. परिणामी रस्ता खुला करण्यासाठी महसुल विभागाने पोलिस बंदोबस्ताची मागणी केली. आता दोन महिने उलटून गेले तरी पोलिस बंदोबस्त मिळाला नाही. याबाबत अधिक माहिती घेतली असता दोन महिन्यांपासून एस.पी.कार्यालय यवतमाळ येथे परवानगी करीता प्रकरण पाठवले असल्याची माहिती मिळाली.
तसेच मे महिन्यात मानकी ते वणी या पांदन रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. दरम्यान रस्त्याचे काम सुरु असतांना प्रत्येक शेतकऱ्यांनी स्वखुशीने आप आपल्या शेताचे तारेचे कुंपण, झाडे झुडपे तोडून सहकार्य केले. परंतु एका शेतकऱ्याने रस्त्यावर आलेले तारेचे कुंपण काढण्यास मनाई केली. याबाबत सर्व शेतकऱ्यांसह गावातील सर्व पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार वणी यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार तलाठी, मंडल अधिकारी मोका स्थळी पोहोचले परंतु अतिक्रमण करून रस्त्यावर तारेचे कुंपण करणाऱ्या शेतकऱ्याने अतिक्रमण काढण्यास मनाई केली. त्यामुळे महसुल विभागाने सदर अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी केली. परंतु १५ दिवस उलटूनही पोलिस प्रशासनाकडून पोलिस बंदोबस्त पुरविण्यात आले नाही. त्यामुळे पांदन रस्त्याचे काम अर्धवट राहिल्याने शेत शिवारातील पाणी गावात शिरलं आहे. आधिच तहसीलदार वणी यांच्याकडून अतिवृष्टी चा इशारा देण्यात आला आहे. जर अतिवृष्टी झाल्यास शेत शिवारातील पाणी गावात शिरलं तर काही घराचे नुकसान होणार आहे. विशेष म्हणजे शनिवारी दि.९ जुलै ला झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी काही घरात शिरले होते. त्यामुळे काही लोकांचे नुकसान झाले आहे. आता तिन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असल्याने पाण्याचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.