दिनेश कुऱ्हाडे
प्रतिनिधी
आळंदी : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि नगर परिषद आळंदी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रपित्याचे पुण्यस्मरण’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.आळंदी येथे घाटावरील रक्षा विसर्जन स्तंभ येथे रविवार,१२ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता हा कार्यक्रम होईल. यावर्षी ह. भ. प. श्यामसुंदर सोन्नर महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.गांधीवादी कार्यकर्ते, वारकरी बांधव,ग्रामस्थ,विद्यार्थी, युवक-युवती आणि राष्ट्रपित्याचा आदर करणारे नागरिक अशा सर्वानी या कार्यक्रमास उपस्थित राहावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर महात्माजींच्या इच्छेनुसार त्यांच्या अस्थी रक्षेचे भारतातील प्रमुख नद्यांप्रमाणे इंद्रायणीमध्येही विसर्जन झाले. एका कलशातील अस्थी रक्षेचे विसर्जन आळंदी येथील इंद्रायणी नदीमधे दि.१२ फेब्रुवारी १९४८ रोजी करण्यात आले. त्यांची स्मृती म्हणून इंद्रायणी काठी रक्षा विसर्जन स्तंभ उभारण्यात आला. दरवर्षी १२ फेब्रुवारी रोजी आळंदी येथे गांधीजींना अभिवादन करण्यात येते.७५ वर्ष ही परंपरा सुरु आहे.यावर्षी सुद्धा हा अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. इंद्रायणी नदी च्या घाटावर सकाळी ठीक साडेआठ वाजता हा कार्यक्रम होईल.महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ कुमार सप्तर्षी,आळंदी नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्ष वैजयंती उमरगेकर, माजी उपनगराध्यक्ष आदित्य घुंडरे,महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव संदीप बर्वे मुख्याधिकारी कैलास केंद्रे,कस्तुरबा आदिवासी ज्ञानसेवा मंडळाचे अध्यक्ष देवराम घुंडरे,स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणपतराव कुर्हाडे पाटील,महाराष्ट्र गांधी स्मारक निधी विस्तार अधिकारी तुषार झरेकर आदी उपस्थित राहणार आहेत.