ज्ञानोबारायांच्या सेवेपासून कोणालाही वंचित करावे व भेदभाव करावा असा हेतू आळंदी देवस्थानचा नव्हता… — प्रस्थान सोहळ्यात आळंदीकरांची नाराजी असुनही ग्रामस्थांनी देवस्थानला सहकार्य केले… — प्रस्थान सोहळ्यातील झालेल्या घटनेबाबत देवस्थानच्या वतीने स्पष्टीकरण सादर… 

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराज प्रस्थान सोहळ्यात देऊळवाड्यात प्रवेश देण्याबाबत पालखी सोहळ्यातील सर्व घटकांकडून मार्गदर्शक तत्त्वे सर्व संबंधितांशी चर्चा करून निश्चित करण्यामागे संस्थान कमिटीचा स्वार्थ नाही. अथवा, कोणालाही ज्ञानोबारायांच्या सेवेपासून वंचित करावे व भेदभाव करावा, असा हेतू नाही. अनुचित घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वारकरी विद्यार्थ्यांसह सर्व संबंधितांनी देवस्थानला यापुढेही किंतू न बाळगता सहकार्य करावे असे आळंदी देवस्थानच्या वतीने स्पष्टीकरण देण्यात आले.

       संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याच्या दिवशी म्हणजेच रविवारी ११ जूनला वारकरी शिक्षण संस्थेतील वारकरी विद्यार्थी आणि पोलिस प्रशासन यांच्यातील घडलेला प्रसंग सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय खेदकारक आणि अनुचित होता. थोडं सामंजस्य दाखवून तो प्रसंग टाळता आला असता. त्यामुळे सेवा, शिस्त, सारासार विचार आणि भावना यांचे संतुलन येत्या काळात सर्वांनाच पाळावे लागणार असल्याची भावना आळंदी देवस्थानने एका निवेदनाद्वारे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

      संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यात आळंदीत वारकरी व पोलिसांमध्ये घडलेल्या ‘त्या’ घटनेच्या पार्श्वभूमीवर देवस्थानने पाच दिवसांनंतर शुक्रवारी (दि.१६) आपली अधिकृत भूमिका लेखी १६ मुद्दा वर लेखी निवेदनाद्वारे मांडली आहे.

        आषाढी वारी पालखी प्रस्थान दिवशी आळंदीत वारकरी विद्यार्थी आणि पोलिसांची झटापट झाल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला. याबाबत राज्यात वारकऱ्यांना मारहाण झाल्याचा दावाही विरोधी पक्षातील नेत्यांनी व वारकरी संघटनानी केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पिंपरी पोलिस आयुक्तालयाचे आयुक्त विनयकुमार चौबे यांनी मात्र मारहाण झाली नसल्याचा खुलासा केला. याबाबत आळंदी देवस्थानने मात्र अद्यापपर्यंत अधिकृत भूमिका मांडली नव्हती.

        अखेर आळंदी देवस्थानच्या वतीने निवेदनाद्वारे पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे आणि प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी प्रस्थान सोहळ्यात देऊळवाड्याबाहेर झालेल्या घटनेबाबत पार्श्वभूमी मांडली. देवस्थानच्यावतीने सांगण्यात आले की, मंदिराचे आवार आणि प्रस्थानासाठी दरवर्षी वाढत जाणारी गर्दी पाहता मंदिरात जमणारे वारकरी व दिंडीकरी यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने प्रवेश किती जणांना द्यायचा, हा नेहमीच कळीचा मुद्दा होता. भावनेईतकाच कायदा सुव्यवस्थाही महत्त्वाची आहे. मांढरदेवी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मंदिरातील संख्येवर मर्यादा असावी असे अनेक निर्देश प्राप्त झाले होते. त्यामुळे सर्वांना विश्वासात घेऊन मर्यादित वारकऱ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. दिंडीकरी, फडकरी, व मानकरी आदींनी सोहळ्यातील संबंधित घटकांनी विवेक बाळगून प्रस्थान सोहळा साजरा केला.

       आळंदीकर ग्रामस्थांची खांदा देण्यासाठी संख्या देखील यावर्षी 125 इतकी असावी व तेवढेच पास संस्थान तयार करून देईल असा प्रस्ताव स्वीकारण्यात ग्रामस्थांना संस्थान कमिटीने मोठ्या प्रयत्नांनी राजी बनवले त्या संदर्भात काही आळंदीकर ग्रामस्थांनी तीव्र नाराजी असंतोष देखील प्रगट केला परंतु प्रस्थान सोहळ्याच्या दिवशी अंतिमतः ग्रामस्थांनी त्याबाबत संस्थान कमिटीला सहकार्य केले.