जेष्ठ पत्रकार प्रा.महेश पानसे सरांचा अभिष्टचिंतन सोहळा भद्रावती नगरीत मान्यवरांच्या उपस्थितीत ३ फेब्रुवारी ला संपन्न होत आहे.
गत २५ वर्षाच्या कालखंडात आपल्या निर्भीड,तेवढ्याच मार्मिक दखलपात्र लिखाणाची छाप पाडणारा पत्रकार म्हणून ओळख असलेल्या या जेष्ठ पत्रकाराच्या पत्रकारितेतील व पत्रकार संघातील मोठ्या योगदानाची अपुर्वाई बघता त्यांना पत्रकारितेतील ‘उस्ताद’ संबोधने वावगे ठरणार नाही.
बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेले आमचे गुरू महेश पानसे सरांनी आपल्या पत्रकारीतेची सुरवात दै.नागपूर पत्रीका या पुर्व विदर्भातील लोकमान्य वर्तमान पत्रातून केली.
अभ्यासू वृत्ती, निर्भीडता, सामाजिक व प्रशासकीय घटनांची बारीक निरीक्षणे नोंदीची हौस,यामुळे पुढे अनेक बड्या दैनिकात गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात आवृत्ती प्रमुख, जिल्हा समन्वयक पदावरून त्यांनी पत्रकारीतेची व्यापकता व परिणामकारकता कशी असते हे दाखवून दिले.
सामाजीक, राजकीय ,शैक्षणिक, शासन व्यवस्थेवर वा केलेले इतर लिखाण ‘दखलपात्र’ या सदरात मोडतात. पत्रकारितेचे आयाम बदलत आहेत, चौथ्या स्तंभावर टिकास्त्र चालत आहेत मात्र अजूनही महेश पानसे सरांसारखे पत्रकारितेतील चाणक्य पत्रकारितेवरील टिकास्त्र परतविण्यात सक्षम ठरतात.
आखाड्यातील उस्ताद जसे कुस्तीधर्माचे पालन करून आखाडा मारतो तसे आपल्या आजवरच्या पत्रकारितेत जेष्ठ, निर्भीड पत्रकार महेश पानसे यांनी “पत्रकारिता परमो धर्म” पाळत या क्षेत्रात आपल्या पत्रकारितेची छाप सोडली आहे.
महेश पानसे सर आपले पत्रकारितेतील आयुष्य पत्रकारीतेच्या प्रगतीसाठी व आपल्या सहयोगी वार्ताहर,पत्रकार यांच्या प्रगल्भतेसाठी जगत आहेत हे वेगळे सांगायची गरज नाहीत.
आजवर ३०० वर सुशिक्षितांना पत्रकारितेच्या प्रवाहात सामील करुन घेण्याचे व त्यांना निरंतर मार्गदर्शन करण्याचे सरांचे काम आदर्शवत आहे. सडेतोड लिखाणासाठी कधीच तडजोड नाही, यासाठी अनेकदा वर्तमानपत्र व्यवस्थापनाचे कान टोचवून मोकळे होण्याचे महेश पानसे सरांचे धाडस अनोखे.
पत्रकारीता ही जबाबदारी व कर्तव्य यांची सांगड हेच त्यांच्या आजवरच्या पत्रकारीतेचे तत्व राहिले आहे. अनेक लहानमोठ्या वर्तमानपत्रात काम करीत असताना अगदी अल्प कालावधीत या वर्तमानपत्रांना त्या परिसरात, जिल्ह्यात शिखरावर नेऊन ठेवल्याचे अनेकदा त्यांनी दाखवून दिले आहे.
पत्रकारितेतील चाणक्यनिती कधी व कशी वापरायची हे सरांना त्यांच्या पत्रकारितेतील अनुभवातून व निरंतर उंचावलेल्या प्रगल्भतेतून अवगत झाले आहे हे लक्षात येते.
सरांच्या लेखनीला जी धार गवसली आहे ती धार निष्पक्षपणा,निभिडता याचीच साक्ष देते.
अनेक वर्तमानपत्रांमध्ये जिल्हा प्रमुख म्हणून काम करताना संपादकीय,वितरण व जाहिरात या तिन्ही विभागाचे एकत्रीत व्यवस्थापण सांभाळण्याची सर्कस आपल्या चाणक्य नितीने महेश पानसे सरांनी अनेकदा यथोचित पार पाडल्याचे आम्ही बघीतले आहे.
मोठ्या दैनिकांमध्ये आवृत्तीचे काम सांभाळताना,सोबत निरंतर दखलपात्र लिखाण करताना संपुर्ण सजगता असावी लागते.आपली पुर्णवेळ नौकरी सांभाळून मोठ्या दैनिकांमध्ये ही जबाबदारी सांभाळण्याचे तंत्र भल्याभल्यांना जमणारे नाही.मात्र हे सरांनी करुन दाखविले आहे.
संघटन कौशल्य कसे असावे? हे महेश पानसे सरांकडून शिकण्यासारखे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघात, चंद्रपूर जिल्हात एकला चलो रे म्हणत महेश पानसे सरांची एन्ट्री झाली.
चंद्रपूर जिल्ह्याध्यक्ष म्हणून अवघ्या वर्षभरात १५ पैकी १३ तालुक्यात १७ शाखा उघडून त्यांनी आपल्या संघटन कौशल्याची मोठी चूणूक दाखवून दिली. संघटनेने विदर्भ विभागीय अध्यक्ष पदाची जबाबदारी टाकली.
अवघ्या तिन वर्षात चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर,भंडारा, गोंदिया, वर्धा जिल्ह्यात व जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये मजबूत शाखा उघडून संघटन कौशल्य कसे असावे हे दाखवून दिले. पत्रकारांच्या संघटना टिकवीणे फार कठीण काम समजले जाते.मात्र महेश पानसे सरांच्या नेतुत्वात उभ्या केलेल्या सर्व शाखा संघटीत व कार्यक्षम आहेत हे विशेष.
महेश पानसे सरांचे नेतुत्वात नागपूर, ब्रम्हपूरी,चिमूर येथे पत्रकारांचे विदर्भ अधिवेशन यशस्वी झाले आहेत.महेश पानसे सरांची पत्रकारितेतील धमक व आगळीवेगळी ओळख हेच खऱ्या अर्थाने संघटन बांधणीचे स्त्रोत आहे.
पत्रकारितेच्या व्यापकतेची आस्था व पत्रकारीतेतील त्यांची चाणक्य नीती संघटन वाढविण्यात महत्वाची ठरली हे विशेष. पत्रकारितेतील उस्ताद तर ते आहेतच सोबत राज्य पत्रकार संघातही ते ‘उस्ताद’ ठरले आहेत.
त्यांच्या संघटन कौशल्याची दखल घेत राज्यातील सर्वात मोठ्या या पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.ही त्यांच्या संघटनेतील कामाची पावती आहे.
पत्रकारीता व पत्रकार संघटना या दोन्ही बाबी सरांच्या बौद्धिक श्रीमंतीची साक्ष देतात.दोन्ही काम तेवढ्याच ताकदीने सर सांभाळत आहेत. लिखाण व मार्गदर्शन सदोदीत त्यांचेकडून घडत राहो हिच त्याच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमीत्य अपेक्षा व पुढील वाटचालीसाठी मनस्वी शुभेच्छा!
महेश पानसे सरांचे मागदर्शन चिरकाल लाभावे ही आमची रास्त अपेक्षा आहे.