स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांना कलागुण सादर करण्यासाठी पर्वणीच :- अनिल स्वामी… — विश्वशांती विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा…

    सुधाकर दुधे

सावली तालुका प्रतिनिधी 

    वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांना कलागुण सादर करण्यासाठी एक आनंदाची पर्वणीच असते.सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना कलाविष्कार सादर करण्यास एक चांगले व्यासपीठ उपलब्ध होते. त्याद्वारे विद्यार्थ्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळते असे प्रतिपादन भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अनिलजी स्वामी यांनी केले.

         भारत शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावली येथे दिनांक २८,२९,३० डिसेंबर २०२३ या कालावधीत वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आणि बौद्धिक व शारीरिक विकास साधण्यासाठी तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांसाठी कबड्डी,खो-खो, रनिंग,गोळा फेक,बुद्धिबळ, वॉलीबॉल, वादविवाद, वक्तृत्व,गीतगायन,प्रश्नमंजुषा स्पर्धेचे व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

           वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अनिल स्वामी यांच्या हस्ते पार पाडण्यात आले तर अध्यक्ष म्हणून मंडळाचे सचिव राजाबाळ पाटील संगीडवार यांचे उपस्थितीत प्रमुख पाहुणे म्हणून मंडळाचे अंकेक्षक सुनील बल्लंमवार,सदस्य रामभाऊ येनुगवार,प्राचार्य अशोक खोबरागडे,गंगाधर कुनघाडकर,सुनील येनगंटीवार ,विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार,पर्यवेक्षक सुधाकर मेश्राम उपस्थित होते.तसेच स्पर्धा परीक्षा व युवकांपुढील आव्हाने यावर सावली पोलिस स्टेशनचे ठाणेदार आशिष बोरकर यांनी मार्गदर्शन केले.

       बक्षीस वितरण व समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावलीचे उपाध्यक्ष अनिल स्वामी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मंडळाचे सचिव राजाबाळ पाटील संगिडवार,कोषाध्यक्ष डॉ.विजय शेंडे,अंकेक्षक सुनील बल्लमवार,सदस्य अजयभाऊ गड्डमवार शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष आकाशकांत बुर्रिवार,विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार,पर्यवेक्षक सुधाकर मेश्राम होते. समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी विविध स्पर्धेमध्ये प्रथम,द्वितीय,तृतीय क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि पदक देऊन गौरविण्यात आले.

         सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक सुधाकर मेश्राम यांनी केले तर संचालन राजू केदार तर आभार उर्मिला बारेकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.