२ ऑक्टोबर रोजी आभासी पद्धतीने होणार रामाळा तलाव व सांडपाणी प्रकल्पाचे उदघाटन…

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

            वृत्त संपादिका 

चंद्रपूर – २ ऑक्टोबर रोजी देशातील विविध प्रकल्पांचे उदघाटन,भूमिपुजन व लोकार्पण पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्याद्वारे आभासी पद्धतीने केले जाणार आहे. या विविध प्रकल्पात चंद्रपूर शहरातील रामाळा तलाव पुनर्जिवीकरण प्रकल्पाचे भूमिपुजन व सांडपाणी प्रकल्प व संरक्षक भिंत उभारणी प्रकल्पाचे उदघाटन या दोन प्रकल्पांचा सुद्धा समावेश आहे. महानगरपालिका स्तरावर प्रियदर्शिनी सभागृहात सदर कार्यक्रम आभासी पद्धतीने लाईव्ह बघण्याची व्यवस्था मनपामार्फत २ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता करण्यात आली आहे.

          रामाळा तलाव पुनर्जिवीकरण अंतर्गत मच्छीनाला २ दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प उभारला जाणार आहे. तसेच मच्छीनाला व जलनगर येथे संरक्षक भिंत उभारली जाणार आहे. रामाळा तलाव दुषित न होण्याच्या दृष्टीने शहरातील जमा झालेल्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर केला जाणार आहे. यामुळे तलावाची स्वच्छता राखली जाऊन पर्यावरण पुरक पाण्याचा स्रोत निर्माण होण्यास मदत मिळणार आहे.

           त्याचप्रमाणे चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशनच्या साहाय्याने पठाणपुरा येथ ४५ दशलक्ष लिटर पाण्याचा प्रकल्प उभारला जाणार असुन शहराचे सांडपाणी त्या प्रकल्पात सोडले जाणार आहे. त्यावर प्रक्रिया करून प्रक्रिया केलेले चांगले पाणी चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशनला पुनर्वापरासाठी दिले जाणार आहे. यामुळे इरई धरणातून होणार शुद्ध पाण्याचा वापर कमी होणार असुन त्या पाण्याचा वापर शहर वासियांसाठी केला जाऊ शकणार आहे.

         या उदघाटन सोहळ्यात अधिकाधिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.